जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शहिदी समागम कार्यक्रम आयोजनाची आढावा बैठक संपन्न
*ठाणे, दि.4(जिमाका):- "हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर" यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त 21 डिसेंबर रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रम समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी तसेच अशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय प्रचार व प्रसार समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
नवी मुंबई,खारघर येथील ओव्हल मैदान येथे दि.21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या कालावधीत शहिदी समागमचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमास देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असणार असून, या कार्यक्रमाची सुरुवात आरम्भता की ‘अरदास’ रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते आज करण्यात आली. या कार्यक्रमास शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहिवाल आणि अन्य सर्व समाजांचे समाजबांधव देखील लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी वेळी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ जिल्हास्तरीय प्रचार व प्रसार समितीचे सनियंत्रक आणि समन्वयक संदिप माने, ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, भिवंडी तहसिलदार अभिजित देशमुख, अंबरनाथ तहसिलदार अमित पूरी, उल्हासनगर तहसिलदार कल्याणी कदम, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त किसनराव पालांडे, सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम, प्र.माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे, उल्हासनगर, ठाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी, विविध विभागातील अधिकारी, ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ जिल्हास्तरीय प्रचार व प्रसार समितीचे अशासकीय सदस्य अमरसिंह कलसी, मेहेरसिंह रंधवा, तस्वीरसिंह, सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहिवाल समाजाच्या गुरुव्दारा आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी 21 डिसेंबर 2025 रोजी खारघर येथे होणाऱ्या शहिदी समागम कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. हा कार्यक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असून शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाजांचे श्री गुरू तेग बहादूर साहबजी यांच्याशी असलेले ऐतिहासिक नाते संबंधित अधिक दृढ होऊन राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक ऐक्य वृध्दींगत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास ठाणे आणि रायगड जिल्हयासह राज्यभरातून शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल व सिंधी समाजबांधव मोठ्या संख्येने जाणार आहे. ठिकठिकाणाहून खारघर, नवी मुंबई येथे येणाऱ्या भाविकांची वाहतूक व्यवस्था, चहा, पाणी, नास्ता, वैद्यकीय मदत, सुरक्षा आदींसह विविध बाबींचे सूक्ष्म नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असून त्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे जीवनकार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या 350 व शहिदी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याची माहिती शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होण्यासाठी शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यासोबतच त्यांच्या कार्यावर आधारीत चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावी. ठिकाठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात यावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांची संख्या समन्वयकांनी सादर करावी. त्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कार्यक्रमाचे नियोजन सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडावे यासाठी शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल व सिंधी समाजबांधवांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी केले.
00000000

